सोमवार, १६ एप्रिल, २०१८

एक संध्याकाळ मंतरलेली...........!

एक संध्याकाळ मंतरलेली...........!

     मराठी "गझल" साम्राज्याचे अनभुशिक्त सम्राट आदरणीय गझलकार  सुरेश भट यांच्या जयंतीनिमीत्त कल्याण पु.ल. कट्टा येथे  कल्याण काव्यमंच व  चारमित्र  यांच्या संयुक्त विद्यमाने "गझल सरीं" हा मराठी गझल मुशायराचे आयोजन केले होते.

     एेन रणरणत्या उन्हाळ्याच्या दिवसातली कालची संध्याकाळ रम्य अगदी मंतरलेली होती.  एक डेरेदार पारंब्यांनी मढलेला हिरव्यागार वृक्षाचा पार म्हणजे व्यासपीठ आणि त्याच वृक्षाच्या विशाल  खांद्यावर कल्याण काव्यमंच व  चारमित्र  या साहित्य चळवळीचे दिमाखदार बैनर बस्स !
      हया नैसर्गीक नेपथ्याच्या पार्श्वभुमीवर आजच्या गझलसरींची बरसात रंगतदार होणारच  हे गझलसरींमध्ये चींब भिजण्याच्या लालसेने आलेल्या रसिकजनांच्या उदंड प्रतिसादावरून दिसत होतेच....!
या गझलमुशाय-यात  महाराष्ट्रातील नवोन्मुख युवा तसेच ज्येष्ठ गझलकार असा सुंदर समन्वय साधून "गझलसरींचा " वर्षाव हा नुसता मनाला चींब करणारा नाही तर अंतरमनातील सृजनतेला साद घालणारा होणार हे निश्चित हेते.!
        थोडयाचवेळात हे स्थिर शांत चित्र सजीव होत गेलं ते कल्याण काव्यमंच चे हरहुन्नरी उत्साहr आणि कविता म्हटले की आनंद सागराचा तळ ढवळून काढणारे श्री. सुधीर चित्ते सरांनी आपल्या जादुई शब्दांतून प्रस्तावना करायला सुरूवात केली तेव्हा!  या खास या कार्यक्रमासाठी आलेल्या श्री. संदिप गुप्ते  ज्यांनी 76 वा गझल मधील  "दिवाण"  लिहीला त्यांचे खास स्वागत करण्यात आले.  श्री. संतोष हुदलीकर हे खास सपत्निक नाशिकहून या कार्यक्रमासाठी आले होते त्यांचेही स्वागत करण्यात आले!  उत्साही प्रस्तावने नंतर प्रत्यक्ष "गझलसरी"  मुशायराची प्रमुख सुत्र  कल्याण काव्यमंचचे ज्येष्ठ गझलकार श्री. प्रशांत वैद्य यांच्याकडे सुपूर्द केेली....!
     श्री. प्रशांत वैद्य म्हणजे "गझल" मधील दादा माणूस !

शेवटी शेवटी जेव्हा मला मी उमगलो होतो
आतल्या आत मी तेव्हा खुपदा बरसलो होतो !

अशा या मनस्वी आणि संवेदनशील गझलकाराने अतिशय प्रसन्नतेने गझल मैफीलीची सुरूवात करून देतानाच ......

नेल्या जरी उन्हाने माझ्या गझलसरी
आल्या पुन्हा नव्याने माझ्या गझलसरी!

अशा सुंदर शेराने मुशाय-यात सामील सर्व गझलकारांचे सुंदर स्वागत केले.....!

प्रत्येक शायर ची ओळख म्हणजे त्याचा एक एक शेर असतो याचा प्रत्यय मग सामील प्रत्येक गझलकाराच्या गझलीयत मध्ये दिसत गेला....!!

विजय उतेकर मुंबई....

होतात वार सारे पाठीवरीच माझ्या
तू वार मोजताना मागून मोजणी कर  !

किंवा
सुर्य कलतो जीवघेणा काळ येतो
सावल्या मी चोरल्याचा आळ येतो..!

स्पर्श झाला जुना झाल्या जाणिवा
शहारा हा तरी तात्काळ येतो...!

 तसेच

पाहुनी लगबग समाधीवर फुलांची
चार स्वप्ने आत्महत्येवर निघाली!

असे एकापेक्षा एक जीवघेणे शेर आणि मैफील रंगत गेली... क्षणात मुग्ध झाली......

जयश्री कुलकर्णी नाशिकच्या तरूण युवा शायरा... !

अतिशय सयंत तरिही टोकदार शायरी....
 वाटे वाटे नको नको जे वाट्यास येत आहे
करतोस तुच दैवा गोलमाल हा बहुदा ...!

किंवा -

ईतके कुठून आले रस्त्यात खाचखळगे
तत्वानुसार केली वाटचाल बहुदा ...!

क्या बात  क्या बात रसिंकांचा उदंड प्रतिसाद.... आणि मैफल रंगत होती, सोबत प्रशांत वैद्यांचे सुत्रसंचालन हास्य आणि मिश्किली बहार आणत होते....!  दर्दींची गर्दी वाढत होती....
मध्येच प्रेमळ अपर्णाताईची , चित्ते सरांची रसिक प्रेक्षकांना पाणी चहा देण्याची लगबग आणि तत्परता पाहून कार्यक्रमाच्या नियोजनाला दाद मिळत होती.!

आणि मग अजित मालंडकर यांच्या तरंन्नुम मध्ये सादर केलेल्या गझल म्हणजे मुशायराची चढती कमान होती....




शुक्रवार, ६ एप्रिल, २०१८

स्री पुरूष मैत्री एक दिवास्वप्न !

      अहो ..... तुम्ही आरशात पहा जरा स्वत:ला !   बघा  तरी कसा अवतार झालाय ? पोटाचा घेर वाढलाय, चेहरा केवढा ओढल्यासारखा दिसतोय ! स्वत:कडे लक्ष द्या नं जरा.  किती काम आणि काम करीत रहाल?  कीती वेळा तुम्हाला हे सांगितलं पण तुम्ही  माझं कशाला एेकाल... तुम्हाला एखादी मैत्रीण असती तर बरे झाले असते .... निदान तिचे तरी एेकलं असतं.! असं मी माझ्या प्रिय नव-याला बोलते .... तेव्हा त्यांच्या चेह-यावर मिश्कील हसू तरळतं...! हे मी माझ्या पतीला एवढ्या सहज बोलू शकते तितक्या सहज मी त्याची मैत्रीण खरंच स्वीकारेन का?

     मी एक स्त्री  आहे  आजची आधुनिक पुरोगामी  विचारांची  … तरीही माझ्या विचारांना पारंपरिक संस्कारांची एक बैठक आहे ! पुरोगामी विचारांच्या तळाशी अभेद्य अश्या परंपरेची घट्ट वीण आहे तिची गाठ माझ्या दैनंदिन व्यवहारपासून ते एकूण  जीवन मूल्यांपर्यंत वेढली आहे !  अश्या ह्या समांतर रेषेतील जगण्यात मी माझे स्त्रीत्वाचा स्वाभिमान जपण्याचा प्रयत्न करते  …  तेंव्हा माझा स्वत:शीच मानसिक संघर्ष खुप होतो.

     मग हा संघर्ष होत असतांना आपल्या मनातील प्रत्येक विचाराला नैतीक अधिष्ठान असतेच असे नाही. कारण हा संघर्ष खरंतर  मन आणि बुद्धी यांच्यात होत असतो.  

     जेव्हा  हा  पुरोगामी आणि पारंपारीकतेचा संघर्ष स्री-पुरूष नातेसंबंध असा माझ्या आत होत असतो तेव्हाच्या विचारसंक्रमणात  आपण आपल्या काही नितीमुल्यांचा पुन्हा एकदा नव्याने आणि अधिक प्रगल्भतेने विचार करावा असे वाटते. तेव्हा वाटते आपले अस्तित्व ज्या परंपरा संस्कार यांच्या पायावर उभे आहे त्यांना पुन्हा एकदा स्री-पुरूष दोघांनीही नव्या दृष्टीकोनातून तपासले पाहिजे आणि काळाप्रमाणे त्यांचा स्विकार करून जगणे अधिक समृद्ध केले पाहिजे ! पण जगणे समृद्ध करणे म्हणजे नेमके काय? सहज, सोपे, सुटसुटीत जगता येणे  या जगण्याला मी समृद्ध मानते.  जिथे प्रत्येक विचारात सुस्पष्टता असते,  गृहितकांना स्पष्ट नकार असतो, आणि प्रत्येक विचारामागे कृतीमागे आयुष्याला अधिक अर्थपुर्ण करण्याची आस असते, एवढेच नाही तर त्या नात्यामुळे आपल्या जगण्याला उर्जीत चालना मिळणे अपेक्षीत असते.

     प्रत्येक नात्यामध्ये ज्याची त्याची स्वतंत्र जागा असावी.  पण ही जागा कोणत्याही नात्याच्या दृढतेला विश्वासाला धक्का देणारी नसावी.  नात्यांमधील आस्था , प्रेम हे कृत्रीम न रहाता ते अधिक सकस आणि सजीव व्हायला पाहिजे.   प्रत्येकाचे एक  स्वतंत्र भावविश्व असते. त्या भावविश्वात आपल्या भोवती , आपल्या सोबत असणा-या प्रत्येक व्यक्तिचा प्रवेश होत नाही ! एखादाच तिथे पोहचतो जो आपल्या आंतरिक संवेदनांना विचारांना समजू शकतो हे ज्याचे त्याचे स्वातंत्र्य  स्री-पुरूष दोघांनाही उदारतेने सन्मानाने स्वीकारता आले पाहिजे.

     जेव्हा स्री-पुरूष संबंध हा केवळ शारीरपातळीवरून जोखला जातो तेव्हा त्या नात्याला आपसुकच एक दुर्गंधी येते! खरं तर  या नात्याला अनेक कंगोरे आहेत.  जेव्हा एक प्रगल्भ स्री आणि एक प्रगल्भ पुरूष यांच्यात मैत्री होते ती परिस्थीतीच्या अधीन असते तरिही वास्तवाचे भान ठेवणारी आणि एकमेकांच्या स्वतंत्र संसारांचा आदर राखून एकमेकांच्या  सानिध्यात संपर्कात येऊनही परस्परांच्या आत्मीक उन्नती आणि प्रगतीसाठी प्रयत्नशील असते.. ! अशी मैत्री कुणालाही दिवास्वप्नच वाटेल पण अगदी रविंद्रनाथ टागोर, बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, गाोपाळकृष्ण गोखले, सरोजीनी नायडू यांनी अनुभवलेली स्रीपुरूष मैत्रीचे सामर्थ्य याच नातेसंबंधांवर आधारीत असलेल्या  अरूणा ढेरे यांच्या प्रेमातून प्रेमाकडे हे पुस्तकातून वाचायला अनुभवायला मिळते .  अगदी अलिकडचे जी. ए. कुलकर्णी सुनिता देशपांडे, एमरोज अमृता प्रितम साहिर लुधयानवी   या महान विभुतींची उदाहरणे पाहिली की स्री पुरूष मैत्रीचा एक  सुंदर आयाम आपल्याला समजतो.

ही अशी मैत्री दोघांचाही सन्मान, आदर  वाढवणारी आणि समाजात अभिमानाने मिरवता येणारी पाहिजे . 

     या संपुर्ण विचार संक्रमणात एकूणच  स्री - पुरूष नाते मग ते पती पत्नीचे असो वा अन्य कोणतेही  प्रत्येक नात्यात एक खरा सच्चेपणा पाहिजे  !  त्या नात्यामध्ये प्रेम, विश्वास तर हवाच पण प्रत्येक नात्याला त्याचे एक विशीष्ट स्थान असते ते स्थान अबाधीत ठेवून त्याचा योग्य तो सन्मान करणे  आवश्यक आहे.

      थोडक्यात एक अस्तित्व दुस-या अस्तित्वाशी जोडले जाते ते त्यामधील समसंवेदनांमुळेच त्या जितक्या ख-या स्वच्छ निर्मळ तितकेच ते नाते पवित्र असे माझे प्रामाणिक मत आहे.  !

@  समिधा

    

सोमवार, २० जून, २०१६

भातुकली .....!!

                                   
                                                                           
                                      

     श्रीयाची भातुकली आवरत असतांनाच , "अगं ये सुमे तुझं लक्ष कुठे आहे ...?" भाताचं आंधण उतू गेलं तिकडे  ...!सासूबाईंची गर्जना कानी येताच सुमी किचन मध्ये धावली , पटकन भातावरचं झाकण काढायला गेली  आणि जोराचा हाताला चटका बसला , त्याचं तिला आणि सासुबाईंनाही काही वाटलं नाही , सासूबाई मान उडवून देवघरात निघून गेल्या .  हातावर फुंकर घालत सुमीने कांदा चिरायला घेतला  .... डोळ्याला पाण्याची धार लागली , नाक डोळे पुसत पुसत तिनं कांदा चिरून बाजूला ठेवला , तेवढयात बाहेर मोबाईलची रींग वाजली तिने भाताखालचा गॅस मंद केला आणि बाहेर हॉल मध्ये वाजणारा फोन घ्यायला गेली , पहाते तो सासूबाईंनी तो आधीच उचलला होता , " कोण बोलतय .... ? सुलभा  ...?  सुमती आहे नं .... सैपाक करते, काही निरोप आहे का   ...? सुमी दाराशी पदराला हात पुसत उभी होती , अधीरतेने ती फोन घ्यायला पुढे झाली , तेवढयात सासूबाईंनी " मग ठीक आहे   ... ! असं म्हणत फोन कट केला   !   सुमी तिथंच थबकली , सासुबाई  सुमिकडे पहात  म्हणाल्या  " सुलभाचा फ़ोन होता , फ़ोन करायला सांगितलय  ... नंतर कामं आटपल्यावर  . सुमि जागेवर गप्पच उभी , तिच्या डोळ्यातली आनंदाची चमक विझली , आणि मनातली अधिरताही तिथंच गोठली .  ती तशीच आत गेली ,  कामं आटपल्यावर   ...? म्हणजे जेवणं खावणं होईपर्यंत दुपार उलटून जाईल  .  प्रसाद दुकानातून घरी येऊन जेवून एक झोप काढून परत दुकानात जाईपर्यंत चार वाजतील   .  सासूबाई हल्ली दुपारच्या झोपत नाहीत, रात्री म्हणे त्यांना मग झोप लागत नाही , पाच वाजत नाहीत तर श्रीया शाळेतून घरी येऊन आई  भूक लागली करेल   .   सुलभाला फोन तरी कधी करावा   ...?  उगीच ती ऑफिसला दोन दिवस सुट्टी घेऊन बसेल , तिलाही ऑफिस , घर , मुलांचं ऍडजस्ट करावं लागेल  .   काय करावं ...?  सुमतीला काही सुचत नव्हतं .

     आठवड्यापूर्वी सुलभाचा फोन आला होता , कविता खूप आजारी आहे , तिला भेटायला जायला म्हणत होती  .  कविता त्यांची बालपणीची मैत्रीण तिचा कालपर्यंत काहीच संपर्क नव्हता पण तिच्या आजारपणाचा कळलं आणि सुमती कितीतरी वर्ष मागे गेली ....  कविता , सुमती आणि सुलभा अगदी बालवाडी पासूनच्या मैत्रिणी , कसं माहीत नाही पण तिघींची मैत्री शाळेतही कायम होती ,  नववीपर्यंत त्या तिघींचं विश्व म्हणजे शाळा ,अभ्यास, मस्ती आणि भातुकली   ...!   भातुकली खेळायची म्हणजे कित्ती  खुश असायच्या .  सुमतीच्या घराच्या मागच्या बाजूला एक मोठी पडवी होती , त्या पडवीतच तिघींचा स्वतंत्र संसार मांडला जायचा  .  जत्रेतून खरेदी केलेली छोटी छोटी भांडुली आणि झाडाची पानं म्हणजे पोळ्या , फुलं पाकळ्यांची  भाजी आणि लाल विटेचा बारीक चुरा म्हणजे लाल मसाला .  कधीतरी तिघींत पैसे काढून एखादा भिस्किटचा पुडाही असायचा   ...!  थोडे मोठ्या झाल्यावर पडवीतच तीन विटा मांडून जवळच्या झाडांच्या सुकलेल्या काट्याकुट्या गोळा करून चूल पेटवायच्या आणि कुणा एकीच्या आईकडून एक पातेले आणि मूठभर तांदळाचा भात  शिजवायच्या  ...! बाकी सगळं स्वतंत्र पण भात मात्र एकत्र शिजवायचा आणि मग तो अर्धा कच्चा शिजलेला भात मिटक्या मारत आनंदात खायचा  ...!

     या  भातुकलीच्या संसारात सुमीच्या घरासमोर कल्पनेतली फुलांची बाग असायची , दारात तुळस आणि एक विहीरपण असायची ती बागेला, तुळशीला पाणी घालायची ती विहिरीतून ताजं ताजं पाणी काढूनच ....!  तिला नवरा, दीर, नणंद सगळे असायचे पण ते नेहमी गावाला गेलेले असायचे  .  तिला सासू सासरे कधीच नसायचे .

     सुलभाच्या संसारात तिला फक्त एक बाळ असायचं , जे नुसतं रडायचं  आणि सुलभा त्याला सतत घेऊन थोपटत थोपटत जेवण करायची   ... तिच्याकडे एक मनीमाऊपण असायची जिला ती बाळाचं दूध प्यायची म्हणून नेहमी ओरडायची   ....

     कविताचा संसार नेटका असायचा .  तिला नवरा खूप आवडायचा , तो तिला फिरायला न्यायचा , तिला खूप खाऊ आणायचा , तिच्याकडे साडया , दागदागिने खूप असायच्या , ती नेहमी सजत धजत राहायची आणि खोट्या खोट्या आरशात पाहून सतत हसत राहायची    ...!

     हे सर्व आठवताच सुमतीला खुदकन हसायलाच आलं    ...!  तिला आठवलं नववीचा रिझल्ट लागला असतांनाच  तिच्या बाबांची बदली आनगांवला झाली आणि त्यांचं संपूर्ण बि-हाड सोनगांवहून  आनगांवला राहायला आलं . निरोप घेतांना तिघीं गळ्यात गेले घालून किती रडल्या होत्या    ...!

     इकडे आनगांवला सुमती एकटीच होती, पण नवीन गांव , नवीन शाळा, नवीन शिक्षक , मैत्रिणी आणि त्यात दहावीचं महत्वाचं  वर्ष म्हणून खूप अभ्यास त्यामुळे नवीन वातावरणातही ती रमून गेली   .   पण न चुकता ती सुलभा आणि कविताला पोस्टकार्डवर पत्र पाठवायची  .  नवीन शाळा , मैत्रिणी यांच्या गमती जमाती पत्रातून कळवायची , सुलभा कवितापण एकाच कार्डातून त्यांची खुशाली कळवत  राहायच्या   .

     दहावीची प्रिलिम चालू होती, आणि सुलभाचं पत्र आलं , ते पत्र वाचताच सुमतीच्या पायाखालची जमीन सरकली   ...!  पत्रात जे तिनं लिहिले होते त्यावर सुमतीचा विश्वास बसत नव्हता   .  कविताच्या आईवडिलांचा दोघांचाही  मृत्यू झाला होता   .  दोघेही त्यांच्या मूळ गांवी जात असतांना  ते जात असलेल्या जीपला एका मोठ्या ट्रकने धडक दिली होती, आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला होता   ..  कविता आणि तिचा लहान भाऊ बंटीचा तो पोरका आक्रोश करणारा चेहरा क्षणात सुमतीच्या समोर येऊन गेला , तो दिवस तिचा सुन्न छिन्न भिन्न अवस्थेत गेला , तिने आईकडे सोनगांवला जाण्याचा हट्ट धरला.  दुस-या  दिवशीच ती सोनगांवला पोहचली पण कविताची भेट झालीच नाही, तिला पत्र मिळायच्या दोन दिवस आधीच कविताचे मामा मामी येऊन त्या दोघांना घेऊन त्यांच्या मुळगांवी निघून गेले होते  .   सुलभाने सांगितले कविता पार हादरली होती , कोलमडली होती , तिचा तो मामामामींबरोबर जातानाचा हतबल केविलवाणा चेहरा आठवून सुलभा रडत होती आणि मग सुमतीचाही बांध फुटला   .... कविता आता कधी केंव्हा भेटेल हे दोघीनांही माहीत नव्हते .

     बारावीला असतांना सुलभाने एका पत्रात कळविले होते की, कवितांच्या मामाने कविताचे लग्न लावून दिले आहे  .  गावचाच एक शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे   .  सुमतीला भातुकली खेळणारी चिमुकली कविता आठवली जिला "नवरा " खूप आवडायचा   ...!

     पुढे यथावकाश शिक्षण पूर्ण झाल्यावर सुमती आणि सुलभाचेही लग्न झाली , सुमतीने गृहिणीपद स्वीकारलं तर सुलभा  एका सरकारी खात्यात नोकरीला लागली   .  मधल्या काळात दोघींचाही कविताशी काहीच संपर्क झाला नव्हता आणि अचानक एक दिवस सुलभाचा फोन आला,  कविता खूप आजारी आहे, तिला भेटायला  जायला पाहिजे   ...!

     सुलभाला फोन करण्या आधी माझं नक्की झालं पाहिजे, भांडी आवारता  आवरता सुमतीनं मनाशी पक्के केलं .  प्रासाद घरी आला की, जेवता जेवता त्याला सांगून टाकते , तोच मग सासुबाईंना सांगेल मग, दोन दिवसांचा तर प्रश्न आहे  , सासूबाई सांभाळतील दोन दिवस घर.... दुपारी प्रसाद घरी आला , सुमतीने तो हातपाय धुवून आल्याबरोबर समोर जेवणाचं ताट आणून ठेवले ,  आणि तिथंच घुटमळत उभी राहिली ... सुमा  ...!  आई जेवली का गं   ..? प्रसादने   नं राहून विचारले .  हो ... आत्ताच  जेवल्या आणि माझेही झाले  , शेवटी सुमतीने घाईघाईनेच विचारले अहो ...! , मी काय म्हणते, दोन दिवस मी मैत्रिणीकडे जाऊन येऊ का हो ...? प्रसाद जेवता जेवता थांबला ... नं कळून त्याने सुमतीकडे पाहिले ,
" कुठल्या मैत्रिणीकडे ...? प्रसाद .
"माझी शाळेतली मैत्रीण कविता ! " सुलभाकडून कळलं ती खूप आजारी तीच म्हणाली आपण तिला भेटून येऊ या ..! सुमतिने एक दमात सारं सांगितले .
कसं शक्य आहे .... सुमती ...? प्रसादचा आवाज मध्येच वाढला ... सुमती मनातून हिरमुसली . प्रसादने त्याचे म्हणणे सुरूच ठेवले ...
आईला दोन दिवस घर सांभाळता येईल  ...? श्रीया अजून लहान आहे तिची शाळा, ट्युशन , टिफिन कोण पाहील ..? जेवणाचं तर आईला आताच झेपत नाही . ,  कसं जमेल तुला जायला ...?
यावर सुमती काहीच बोलली नाही, प्रसाद जेवण आटपून खोलीत झोपायला निघून गेला  .

     सकाळी चटका लागलेला हात आता झोंबू लागला होता ... डोळ्यात पाणी तरारून आलं होतं ... तिनं जड मनाने सारं आवरायला सुरुवात केली आणि फ्रीजवरच्या घडाळ्याकडे पाहिले , दुपारचे तीन वाजत आले होते ... तिने सासूबाईंच्या खोलीचा कानोसा घेतला, तिकडे शांतता होती, सुमतीने हळूच मोबाईल उचलला आणि गॅलरीत गेली, सुलभाला फोन लावला .
 "अगं ... कधीची वाट पहात होते, कुठे होतीस ...?  सुलभाने जमेल तितक्या घाईने विचारले .
" सुलु ..., नाही गं जमणार यायला ...! सुमतीने खालच्या आवाजात सुलभाला सांगितले .
"अगं मीही तेच सांगायला फोन केला होता तुला ,  माझ्याही बाळाचा प्रॉब्लेम आहे गं ... बेबीसिटींगच्या बाई नेमक्या गावाला जाणार आहेत दोन दिवस मग मलाच थांबावे लागेल घरी , दर्शन , माझ्या नव-याला महत्वाची कॉन्फरेन्स आहे म्हणाला . सुमे नंतरच बघू या कधी जायला जमते  ते ... ! पलीकडून सुमतीचा काहीच रिप्लाय नाही हे पाहून , " अगं ऐकतेस ना ...? सुलभा
"हो गं , ऐकतेय  नां ...!  सुमती
"मग एकदम अशी  शांत का झालीस ...? सुलभाने  काळजीने विचारले .
"नाही गं ...!  पण काय हे सुलु आपण पुरते अडकलो गं संसारात ....! सुमतीच्या आवाजात कंप होता .
"पण तुला कुणी सांगितलं ... कविताच्या आजारपणाचं ....?" सुमती .
"बंटीनं , कविताचा  भाऊ ...". सुलभा
"तो कुठे भेटला तुला ....?" सुमतीने आश्चर्याने विचारले .
काही दिवसा पूर्वी माझ्या ऑफिस मध्ये त्याला कसलसं लायसन्स पाहिजे होतं म्हणून आला होता.  त्यांनच ओळखलं मला  . मी तर बाई ओळखलंच नाही त्याला . खूप लहान वयात मोठा झाल्यासारखा दिसत होता गं !
बराच वेळ बसला होता माझ्याकडे, त्याच्याकडूनच कळले कविताचे ... तिचा नवरा खूप दारू पितो म्हणे, रोजच शिव्या शाप आणि मारहाण करतो म्हणे तिला ...!  लहान वयात लग्न झालेल्या कविताला तेंव्हा काय समज असेल गं तिला ....! खेळायच्या , शिकायच्या दिवसांत तिच्यावर संसाराची एवढी मोठी जबाबदारी आली कशी पेलली असेल गं ...? बंटी सांगत होता कधी कधी खायलाही नसते घरात , एकच मुलगा पण त्याचेही हाल करतो नवरा ,  हा असा दारुड्या वाया गेलेला म्हणून आधीच सगळ्या नातेवाईकांनी त्यांना वाळीत टाकलेय , बंटीचं मग अधे मध्ये जाऊन कविताला पैसे देऊन येतो , पण त्याचाही तिच्या नव-याला राग येतो  ...  खायलाही देत नाही आणि भीकही मागू देत नाही अशी बिचारीची अवस्था करून ठेवली आहे.
"सुलु ...! सुमतीचा आवाज जड झाला होता...  काय गं हे भोग कविताचे ....? असला नवरा मेलेला बरा असंही म्हणवत नाही , तोच काय तो तिला आधार .... पण खरं तर तो असून नसून सारखाच गं ...! सुमतीच्या बोलण्यातून तिला कविताची काळजी वाटत होती हे दिसत होते ,
"हो गं ... खरं तर आपण आता तिच्या सोबत असायला पाहिजे पण परिस्थितीने आपलेही पाय बांधून ठेवलेत .. असं म्हणून सुलभाने हताश होऊन सुस्कारा सोडला ,
"मी बंटीचा मोबाईल नंबर घेतला आहे , तिच्याकडे गेल्यावर तो तिला फोन लावून देईन म्हणाला ,  तुला कळविनच ....  चल ठेवते फोन  म्हणत सुलभाने फोन कट केला .
 
     सुमतीचं  मन विषन्न झाले होते , तेवढ्यात दाराची काडी वाजली , प्रसाद दुकानात निघाला होता.  त्याला दारापर्यंत सोडून सुमती काडी लावून आत आली,  पाच वाजायला अजून वेळ होता ; कालचं गव्हाचं दळण तसंच निवडायचं राहून गेलं होतं .... तिनं चाळण घेऊन गव्हाचा डबा खाली अंथरलेल्या पेपरवर ओतला , गहू पाखडता पाखडता तिच्या विचारांची गिरण कधीच चालू झाली होती ....

     माझी , सुलभाची , कविताची लहानपणीची भातुकली कित्ती कित्ती मागे पडली  आहे .....!  माझी बाग , माझी तुळस , विहिरीतलं ताजं पाणी इथं कुठे आहे ...? सारंच पार सुकून गेलंय ..... !   सुलभाचं बाळ होतं पण त्याला थोपटायला आणि मनीमाऊला ओरडायला ती दिवसभर घरी कुठे होती ....? आणि कविता ...!  तिचा आवडता नवरा , तिला खूप खाऊ आणणारा प्रेमळ नवरा  तरी कुठे होता ...?  तिचं सजनं  धजनं  आरश्यात पाहून सतत हसणं  सारं सारं  कुठे होतं .....?  बालपणातल्या भातुकलीतल्या  आम्ही  त्याच आहोत ...... पण आता आमची भातुकली कुठे आहे ...? ती तर पार बदलली आहे ....... !

      आई .........! श्रीयाची हाक कानावर येताच सुमती भानावर आली ,  सुमतीनं कोप-यात पाहिलं श्रीयाची भातुकली अजून तशीच मांडलेली होती  ......!!



                                                                
                                                                            " समिधा "

   



 
 




 



   
     

गुरुवार, १४ मे, २०१५

"तिची कहाणी "



आज फारच एकटं वाटतंय म्हणून तुला फोन केला...... पलीकडून तिचा आवाज!..... आणि मग मीच जरा स्तब्ध झाले ..... काय बोलावे, पटकन काही कळेना. ती मात्र खुप काही बोलण्याकरिता आतुर वाटली. मी देखील विचारात हरवून गेले होते. ती माझ्या उत्तराची वाट पाहत होती. मी भानावर येत म्हटलं, अगं बोलना.....!.
मला भेटशील का? ती….
मला तिच्याबद्दल पूर्ण सहानुभूती होती, पण मी माझ्या संसारातील रोजच्या व्यवधानांमध्ये पार बुडून गेले होते........ हो नक्कीच....! मी. खरेतर मला अजिबात वेळ नव्हता. लेकीला शाळेत सोडायचे होते, नव-याने बँकेत जाऊंन एक एफडी क्लियर करायला सांगितले होतेघरातील कामं राहिली होती ती वेगळीच ..... माझ्या डोळ्यासमोर सर्व भरभर नाचू लागली...... कधी व्हायची सगळी? पण तिला मी नकार देऊ शकले नाही.  हो! येते ना! आज मात्र जमणार नाही उद्या येईन. चालेल?
पण नक्की येशील ना? तिचा अगतिक प्रश्न.
हो उद्या संध्याकाळी भेटूया ... मी.
पण माझ्या घरी नको. आई असेल .... तुला पाहून उगीचच वैतागेल...... ती. आपण बाहेर भेटू. आपल्या नेहमीच्या मंदिरात? मी. हो चालेल ..... तिने फोन ठेवला .......!
मला उद्याची कामेही आज करणे भाग होते..... एकेक करून आटपायला हवीत. भरभर कामाला लागणे आवश्यक होते ....... पण मी मात्र थंड होते.
काहीशी अस्वस्थ झाले होते!तिचा विचार मनातून काही जात नव्हता.उद्या ती भेटणार आहे .....  तिला माझ्याशी नेमकं काय बोलायाचे असेल? तिला मी अधूनमधून फोन करत असे ....मध्ये एकदा तिला भेटले देखील होते, पण तिची ती विचित्र अवस्था आणि तिला होणारे भास्! मी तेंव्हाच फार घाबरले होते, तरीपण तिला धीर देण्यासाठी तिच्याशी खूप बोलले ... तिला सावरण्याचा प्रयत्न केला होता पण ......?त्यानंतर भेट नव्हती झाली तिची-माझी....खरंतर तीच मला नेहमी फोन करायची. मी जुजबी काही तरी बोलत राहायची .. ती मात्र उत्साहाने तिच्या नवीन उपक्रमांविषयी भरभरून सांगत असायची .... मी तिचे तोंडभरून कौतुक करायची ... तिला प्रोत्साहित करायचे, पण तिला प्रत्यक्षात कधी भेटले नाही .....फक्त एकदाच भेट झाली, तिच्या लग्नात ......!किती खुश होती ती.... आणि तिचे सारे आप्त ..... मी सुद्धा .....त्या भयाण स्वप्नातून, भासांतून ती आता वर्तमानात जगणार होती ...! तिच्या डोळ्यात आता भावी संसाराची स्वप्नं फुलली होती....! मी अगदी वेळात वेळ काढून तिला आवर्जून शुभेच्छा देण्यास तिच्या लग्नाला गेले...! तिचे सौंदर्य अधिकच खुलले होते...! कॉलेजमध्ये तिच्या आगेमागे मुलांचे घोटाळणे आठवले ... पण तिने तेव्हा कुणालाच भीक घातली नाही. त्या मनस्वीचे स्पष्ट म्हणणे होते.. जो फक्त माझ्या सौंदर्यावर भाळेल, त्यास मनाचे सौंदर्य काय कळणार....? माझ्या सौंदर्यास भुलून माझ्यावर प्रेम करतो तो तर माझ्या शरीरावर प्रेम करतो...!आणि हीच मनस्वी मुलगी "त्या" नीच माणसाच्या प्रेमात पडावी? मला तिच्या ह्या प्रेमाबाबत कळले तेव्हा  मी तिला खूप समजावले.... तिचा तो तथाकथित प्रियकर मी पाहिला आणि मी तिच्यावर चिडले..... ही तुझी चॉइस...! काळाकभिन्न, तिच्यापेक्षा वयाने कितीतरी मोठा...! त्याचे कर्तृत्व काय तर समाजसेवा ...... ! मी तिला प्रॅक्टिकल विचार करायचा सल्ला दिला.... समाजसेवा वगैरे गोष्टी ऐकायलावाचायला छान ..... पण तुझा तो पिंड नाही... की, तू संसाराचा भाग म्हणून ह्या गोष्टी स्वीकारशील! .... पण ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली. म्हणाली ...... त्याने माझे सौंदर्य नाही पाहिले ..... मी जेव्हा कुणाला पहिल्यांदा भेटते तेव्हा ती व्यक्ती माझ्याकडे परत वळून पाहतेच ... याचा अपवाद. मी प्रथम त्याला भेटली तेव्हा त्याने माझ्याकडे एकदाही पाहिले नाही.....! हाच तो .... जो माझ्या सौंदर्यावर भाळला नाही... मी स्वत: जर बाह्य सौंदर्याला महत्त्व देत नाही, तर त्याचे दिसणे मला बिलकुल महत्त्वाचे नाही....! आणि जो मनुष्य दुसर-याच्या सुखदु:खाचा विचार करतो तो मनाने किती प्रेमळ असेल....?पण प्रेमाची ही धुंदी लवकरच उतरली....! समाजसेवेच्या बुरख्याआडचा त्याचा खरा चेहरा खूपच भेसूर, निर्दयी आणि स्वार्थी होता...... खरं तर त्याने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी धारण केलेला तो बीभत्स मुखवटा होता....! जेव्हा तिला हे कळले, ती पूर्ण उद्ध्वस्त झाली ....!  मी त्याला ओळखू शकले नाही... मी मलाच फसविले...... तिने स्वत:ला कोंडून घेतले.... वर्षभर ती स्वत:मधेच गुरफटून गेली.. घुसमटली! आत आत तुटत गेली..... आणि मग त्या भयाण भासांमध्येच जगणे सुरु झाले...या सर्व दुष्टपर्वात ती एकटी पडली ...... घरातून-बाहेरून .... तिच्याकडे वळणारी प्रत्येक दृष्टी तिच्यावर हसते आहे ... असे वाटत गेले.....! हो, तिला स्कीजोफ्रेनिया झाला.....!काही वर्ष तिच्यावर उपचार झाले..... ती पूर्णपणे बरी झाली.....  आणि तिचे लग्नही झाले..... ती सुखाने संसार करू लागली....! असे खरेच झाले असते तर ...?  पण तिचे लग्न झाले आणि तिला परत त्या भासांनी घेरले... ती परतली  .....होती तिथेच येऊन ठेपली...! एकटी.....!संध्याकाळी मुलीला स्केटींग क्लासला सोडले आणि मी मंदिरात पोहचले  ..... ती कुठेच दिसली नाही ... मी मंदिराबाहेरच्या चौथ-यावर बसून विचार करत होते. एवढ्यात ती आलीच ..... ती आली आणि मी पाहतच राहिले ..... चेह-यावर वाढत्या वयाच्या खुणा दिसू लागल्या होत्या, शरीर सुटले होते ... खरं तर ती माझ्यापेक्षा एखाद वर्षाने लहानच पण आता तिच्याकड़े पाहून मात्र ती प्रौढा वाटत होती. मी स्वतःला सावरले ..... भेटल्याचा आनंद चेह-यावर आणत तोंडभरून हसले .... तिचेही निस्तेज डोळे चमकले ...कशी आहेस .....? माझ्या प्रश्नावर हसून विचारले .... कशी दिसतेय ....मी किंचित हसून म्हटलं, छान दिसतेस ...!माझ्या बोलण्यावर अजूनच जोरात हसत म्हणाली. छान दिसतेय?” मी क्षणभर घाबरले ....महिन्याभरापूर्वीच मी हॉस्पिटलमधून घरी आले ....!"मला काहीच माहित नाही ...." मी. म्हणजे पुन्हा तुला तसे भास......?? तिच्या डोळ्यात मला तीच ती फोनवरील अगतिकता प्रत्यक्षात दिसत होती .... हो .... गं .........सांग ना  मी काय करू ...... .?  माझ्याकडेही या प्रश्नाचे उत्तर नव्हते.वीस वर्षापूर्वी प्रेमभंगातून आलेल्या डीप्रेशनने या मनस्वी मुलीला स्कीजोफ्रेनियाने घेरले .....!तिचे भास तरी कसे .....? त्या भासांबाबत ती बोलूही शकत नाही ..... असे भास जे जणू तिच्या संपूर्ण अस्तित्वाचा घास घेतील .....! मला यातून बाहेर पडायचे आहे नाहीतर ते भास माझा बळी घेतील ... मीच माझ्या नजरेला नजर भिडवू शकत नाही. ती हतबल होऊन बोलत होती .…!!"मी घर झाडत असेन ना की, मला वाटते मी कुंटणखाना झाडते आहे  … ! खिडकीतून कधी बाहेर पाहावे तर वाटते मी एक वेश्या आहे आणि मी या खिडकीत उभी आहे तर बाहेरील सर्व याच गलीच्छ नजरेने माझ्याकडे पाहत आहेत. मला माझ्या बाबांकडे पाहायची लाज वाटते आईपासून लांब पळावेसे वाटते. मध्ये मी गाण्याचा क्लास पुन्हा सुरु केला होता, पण तिथेही नाही रमले! रेकी शिकले, पण काही फरक नाही. नोकरीसाठी या अवस्थेत मी बाहेर पडू शकत नाही. मी पुन्हा पुन्हा गूढ़ अंधारात फेकली जाते आहे… !मला यातून बाहेर पडायचे आहे. तू मला मदत करू शकतेस असं मला मनापासून वाटते. प्ली, करशील ना मला मदत! तिने माझा हात तिच्या हातात घेतला … !  मला तुझ्यातली शक्ती दे  तुझ्यातला आत्मविश्वास दे  तुझ्यातील सकारात्मक वृत्ती दे  …” तिने माझा हात आता अधिकच घट्ट धरला होता  … ! मीही तो तसाच राहू दिला! माझ्याकडून तिला क्षणभर का असेना दिलासा व आधार  मिळत असेल आणि ती मनाने सावरणार असेल, बरी होणार तर मिळू दे तिला माझ्यातली शक्ती, जागूं देत तिच्यात माझ्यातला आत्मविश्वास.... !!"हे बघ असे भास होऊ लागले की, लगेच ती वाईट विचारांची साखळी तू मनामध्ये दुसरा काही तरी चांगला विचार आणून तोडून टाक...  अध्यात्माची पुस्तके वाच ... गुरुप्रार्थना कर ...... हाणून पाड ते घाणेरडे विषयासक्त विचार .........! मी तिच्याशी असं बरंच बोलले. ती एव्हाना बरीच शांत झालेली वाटत होती ........तिला माझ्याशी अजून खूप बोलायचे आहे, हे दिसत होते. पण संध्याकाळ बरीच झाली होती. माझे मन माझ्या लेकीकडे धाव घेत होते .........!  चल मी निघते परत एकदा भेटू .....!नक्की भेट ....! तिच्या डोळ्यात चमक होती! "तू भेटलीस की परत जगायला हुरूप येतो नाहीतर"  ..... तिने एक दीर्घ उसासा सोडला ...... तिला परत भेटण्याचे कबूल करूंन मी तिथून निघाले .....!!माझे मन आता तिच्या त्या विचित्र भासांचा विचार करू लागले होते...... क्षणभर माझी मीच दचकले ....! आणि    मी माझ्या लेकीचा विचार मनात आणून ती भयंकर साखळी तत्क्षणी तोडून टाकली ...... इतक्यात समोर माझी लेक हात पसरून माझ्या दिशेने झेपावली ......आणि मी भासांतून जागी झाले! क्षणात मी एखाद्या गूढ़गर्द अंधारात जाऊन आल्यासारखे, परतून माघारी फिरल्यासारखे वाटले …! तिच्याजवळही तिचे आपले कुणीतरी कुणीतरी त्या भासातून जागवणारे हवे होते....! ...... ती सर्वार्थी अतृप्त आहे ..........!मी पुन्हा तिला भेटले नाही  भेटू शकत नाही  माझ्यात ती हिंमत उरली नाही! मला मनातून खूप अपराधी वाटतंपण मलाच आता तिच्या गू अंधाराची भीती देखील वाटतेय ....!!

                                              " समिधा "

मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०१४

*** "तिचे अंतरंग" ***

      


मी एक स्त्री  आहे  आजची आधुनिक पुरोगामी  विचारांची  … तरीही माझ्या विचारांना पारंपरिक संस्कारांची एक बैठक आहे ! पुरोगामी विचारांच्या तळाशी अभेद्य अश्या परंपरेची घट्ट वीण आहे तिची गाठ माझ्या दैनंदिन व्यवहारपासून ते एकूण  जीवन मूल्यांपर्यंत वेढली आहे !  अश्या ह्या समांतर रेषेतील जगण्यात मी माझे स्त्रीत्वाचा स्वाभिमान जपण्याचा प्रयत्न करते  …  तेंव्हा माझा स्वत:शीच मानसिक संघर्ष खुप होतो ! त्याचे परिणाम नंतर शारारिक स्वास्थ्यतील अस्वस्थेत दिसतात   ....!

     पण मी जेंव्हा माझ्या पलीकडे पहाते तेंव्हा मला माझ्याच अवती  भवती अनेक स्त्रीया दिसतात ज्या त्यांच्या त्यांच्या पातळ्यांवर संघर्ष करीत आहेत   …काही परंपरांचे जोखड झुगारून स्वत:च्या इच्छेने  जगत आहेत तर काही  परंपरा संस्कार यातच आपले जीवन सार्थकी लावून स्त्रीजीवनाची परिपूर्ति साधत आहेत  …!

     अश्या एक न अनेक स्त्रियांची अनुभव कथन माला मी कधी कथा तर लघुनिबंधा द्वारा माझ्या वाचकांसाठी माझा नविन ब्लॉग "तिचे अंतरंग"  या द्वारे सादर करीत आहे   ! यामध्ये "स्त्री" या गुढत्वाचे माझ्या स्त्रीमनाने घेतलेले वेध आणि त्यावरील  उकल करण्याचा प्रयत्न करणार आहे !  आशा आहे वाचकांनाही स्त्रीचे अंतरंग समजण्यास मदत होईल  ....... !! 


                                                                                                                  "समिधा"